Thursday, March 25, 2010

मला जाऊद्या ना घरी - आता वाजले की बारा

==========================
चांदीचे ताट मांडलेले आहे. ताटा भोवती सुंदर रांगोळी आहे. देवासमोर लावलेल्या धुपाचा मोहित करणारा सुगंध खोलीभर दरवळतोय. बिस्मिल्लांच्या सनईच्या सुरांनी घरातले वातावरण मंगलमय झाले आहे. चारीबाजूने प्रसन्नतेचा शिडकावा होतो आहे. साक्षात अन्नपूर्णा वाढायला उभी आहे. भोजन सुग्रास आहे. भूक ही लागली आहे. पण घशाखाली एकही घास जात नाहियय.

अहो जेवायला कुठून सुरवात करायची हेंच कळेनासे झाले आहे. ताटाच्या आत व बाहेर वाट्यांची चळत आहे. पंच नव्हे तर पन्नास पक्वाने आहेत. गुलाबजामच्या शेजारी रसमलई व रसगुल्ला आहे. श्रीखंडाच्या जोडीला आम्रखंड व कलाकंद आहे. बसुंदीच्या शेजारी शेवयाची खीर आणि सीताफळ रबडी आहे. गाजर हलवा, मुग हलवा, दुधी हलवा आणि जोडीला जिलेबी आहे. पुरणपोळी, गुळपोळी आणि खावा पोळी वाढून झाली आहे आणि अन्नपूर्णा विचारीत आहे " काय आणायचे?"

काय सांगावे ? काय खावे? किती खावे? मी बावचळून गेलो आहे.
सध्या पुणेकर मराठी रसिकांची अवस्था कहीशी अशीच आहे.

पुणे तिथे काय उणे? हे मान्य. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, हे ही तितकेच खरे. पण गेले दोन अडीच महिने पुण्याच्या मराठी रसिकांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचा भडीमार होतो आहे. विएंतनामवर जसा बॉम्ब आणि गोळ्यांचा हल्ला होत होता तसा पुण्यात गेले दोन महिने सांस्कृतिक कार्यक्रमांचा हल्लाबोल चालू आहे. एक चांगला कार्यक्रम झाला नाही कि लगेच दुसरा. एक चांगला सिनेमा बघून होत नाही तर दुसरा त्याहूनही चांगला. जरा उसंत नाही. जर्मन बकेरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या काळातही हे सांस्कृतिक अग्निहोत्र चालूच होते.

पुण्यात आलेल्या स्वाईन फ्लूच्या साथीने पुण्याच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेची पार वाट लावली आहे. सुरवात झाली ती सवाई गंधर्व मोह्त्सावापासून. एरवी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा हा संगीत जलसा. याला काही जण वधू-वर सोहळा असेही म्हणतात. वाघ-सिंह हे जसे रात्री सुळे आणि नख्या पराजत शिकारीला बाहेर पडतात तसे शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नसणारी अनेक उपवर मुले-मुली रात्री शाल पांघरून इथे जमतात. आपला जोडा कुणाशी जुळतोय याचा शोध घेतात.

जरा विषयांतर होईल (ब्लॉग आपलाच आहे त्यामुळे तुम्ही माफ करालच) पण एक घडलेला किस्सा सांगतो. मागे एकदा सवाईतील बटाटावड्याच्या गाडीपाशी मी सिगरेट ओढत उभा असताना त्याच गाडीपाशी एका होऊ घातलेल्या जोडप्याच्या सवाई गप्पा कानावर आल्या.
तो:  छान झाले ना गाणे.  भैरवी म्हणजे पंडितजींचा हातचा मळ. किराणा घराण्याचे हे वैशिष्ट्यच.
(मुर्खा कार्यक्रमाचे हे पहिले गाणे आहे. भैरवी कशी असेल. आईला कधी किराणाच्या दुकानातून साधे पोहे आणून दिले नाहीस तू आणि घराण्याची वैशिष्ठ सांगतोयस. गेली तुझी विकेट-- मी मनात).
पण विकेट जात नाही. त्याच्या शालीच्या झिरमिळ्यात बोटे गुंफून
ती: " राजा. आपल्या प्रेमाची सुरवात अशीच भैरवीने होईल ना रे? (भैरवीने सुरवात? बोंबला.. मी मनात.)
पण दोघांनाही गाणे कळत नसल्याने त्यांचे सूर छान जमले. अशा 'शालीन' लग्नांना मी तेव्हापासून 'शालजोडीतील लग्न' किवा 'सवाई लग्न' असे संबोधतो.

असो. विषयांतर पुरे. सवाईवर एक वेगळा लेख लिहिता येईल. सांगायचं मुद्दा कि स्वाईनफ्लू मुळे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणारा सवाई जानेवारीत घेण्यात आला आणि त्यांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक झंझावाताच पुण्यात सुरु झाला. तो अजून चालूच आहे. सर्व कार्यक्रम दर्जेदार. नाव ठेवायला जागा नाही. सवाई संपत नाही कि राहुल देशपांडे- कम-नाना पाटेकरांचा वसंतोत्सव. त्यात आजोबांची कट्यार नातू पहिल्यांदा चालवणार म्हटल्यावर हा कार्यक्रम चुकवून कसे चालणार?
मग अंतर्नाद, अजय अतुल, रवी शंकर, झाकीर हुसैन, फिल्म फेस्टिवल, शनिवारवाडा नृत्य मोहोत्सव , सोलो जसराज, आर्या आंबेकर आणि बालचमू, शिवकुमार शर्मा, आणि...... ही यादी संपणारी नाही.
यातले निम्म्याहून जास्त कार्यक्रम आमच्या आणि पुण्यातील इतर वृतपत्रानी आयोजित केलेले. हल्ली वृतपत्रांचा मुख्य धंदा पेपर काढणे नसून इव्हेट मॅनेज्मेंट आहे कि काय अशी शंका येते.

हे कमी होते कि काय म्हणून याच काळात अनेक दर्जेदार मराठी सिनेमे झळकले. गाभ्रीचा पाऊस, हरीश्चान्द्राची फॅक्टरी, नटरंग, रिंगा रिंगा, जोगवा आणि काही पा सारखे हिंदी ही. त्यात लिमयेना राष्ट्रीय पुरस्कार. त्याचा सत्कार. एफटीआयची पन्नास वर्षे. प्रमुख पाहुणा देवानंद. ( तो परत रात्री माझ्या ऑफिस मध्ये गप्पा मारायलाही आला होता. सत्त्यांशिव्या वर्षीही सडपातळ. नाहीतर आम्ही. फुटबॉल. हस्तोलंदन करतानाही लाज वाटली स्वता:ची). आमचे आवडते दिग्दर्शक-कम-पोलीस इन्स्पेक्टर सतीश राजवाडे यांचा नाशिकच्या वाड्यात रोज नवीन धुमाकूळ चालूच आहे. अग्निहोत्रासारखा अखंड.

असो. हे सर्व कार्यक्रम आणि सिनेमे पाहता पाहता खऱ्या पुणेकर रसिकांचा खिसा पार रिकामा झालाय. अनेक कामे खोळंबलीत. त्यात परत मार्च महिना. हा महिना सुरु होण्याआधीच माझ्यासह अनेक पगारदार रसिकांचा खिसा साफ झालेला असतो. आता तरी हा सांस्कृतिक हल्ला थांबेल अशी अपेक्षा रसिक करत होते. पण तसे होणे नाही. उद्यापासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चालू होतंय.

आपल्या सर्वांचे मित्र आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलवून जेवणाबरोबर आग्रहाने निमंत्रण दिले आहे. तरी काही जणांना राग आहे कि घरी येवून आमंत्रण का दिले नाही. साहित्यिक सुद्धा कधी कधी अतीच करतात. तुम्ही काय अमिताभ बच्चन आहात का सचिन तेंडूलकर, घरी येवून निमंत्रण द्यायला? या सगळ्या टीका- खुलाशात इतका वेळ वाया गेला कि चियर गर्ल्सना संमेलनास आणायचे राहून गेले. पुणेकर रसिक खरेच एका अभिनव कार्यक्रमास मुकले.

कल्पना करा. कवी कट्ट्यावर काही कवी त्यांच्या कवितेचे काही स्वप्नील शेर म्हणतायत आणि प्रत्येक शेर झाल्यावर चियर गर्ल्स नाचत आहेत. संमेलनाला एक नवी दिशा मिळाली असती. पेपरवाल्यांचे काही कळत नाही. नवीन काही केले कि म्हणायचे हे प्रथेला धरून नाही आणि प्रथेप्रमाणे कार्यक्रम ठरवले की म्हणायचे '' तेच ते आणि तेच ते".

"तरी तुम्हाला विचारले होते. सल्ला मागितला होता कि काय कार्यक्रम ठेवू. तेव्हा नाही हा ब्लॉग साहित्य विषय आठवला," एक आयोजक मला उद्विग्न होऊन सांगत होते. नाही कळत आम्हाला. (चला कबूल करत आहेत हे ही नसे थोडके.)

संमेलन चांगले पार पडो. अहो शेवटी आपल्या पुण्यात होते आहे. फार वस्त्रहरण केले तर आपल्याच शहराची अब्रू जायची. फार नका खोदू राव, आता दिली आहेत ना सूत्र त्यांच्याकडे. पुण्यात नदीकाठच्या एका रस्त्याचे टेंडर २०० कोटीच्या वर गेले आहे. सरस्वतीच्या बाजारात लक्ष्मी फिरून फिरून किती फिरणार? एखादी पेटी इकडे तिकडे. जरा दुर्लक्ष करा राव.

तर मित्रानो आमचे पुढचे तीन दिवस संमेलनात जाणार आहेत. पण माझ्याच नाही तर अनेक पुणेकर रसिकांच्या मनात प्रश्न आहे " घरी काय सांगायचे?" . गेले दोन महिने हे असेच चालू आहे. रोज एक नवा कार्यक्रम, रोज नवा सिनेमा. संमेलनानंतर तरी हे काही काळ थांबेल ना?

हे सर्व कार्यक्रम दर्जेदार आहेत यात काही शंका नाही. नवीन मराठी सिनेमाही पूर्वीच्या तमाशाप्रधान सिनेमांपेक्षा खूप खूप वेगळा आणि अदभूत अनुभव देतो आहे. संमेलनही चांगलेच होईल.
पण त्यानंतर तरी हा सांस्कृतिक भडीमार काही काळ थांबवा. अहो, एखादी चांगली गोष्ट आणि सौदर्य उपभोगायालाही वेळ हवा. भोजन कितीही सुग्रास असले तरी अपचन झाल्यावर काय खाणार?

दर्जेदार कार्यक्रमांची ऐश्वर्या रोज रात्रीच पुणेकर रसिकांना खुणावते आहे. हात धरून बैठकीला बसण्याचे निमंत्रण देते आहे. पण कातावलेला पुणेकर रसिक तिचा नाजूक हात आता बाजूला करतोय आणि अजीजीने म्हणतोय : "मला जाऊद्या ना घरी.... आता वाजले की बारा,".
===============
अभिजित अत्रे
=====

10 comments:

Anonymous said...

one of the best posts....
majja aali...
kasa kay suchte tumhala ase sagle?
sw@t!...

Umesh Isalkar said...

chhan lekh Zala sir .. Its the Great Atre lineage after all ! sarcastic in ligher vein ..!

Snehal S S said...

:) hehe.. full timepass... asa vatata, tumhala ata navin kahi lihiparyant swastha basvat nahi....mastch...

Anonymous said...

Cheer girls chi idea tumhi aadhi ka dili nahi? Punyala junat mhananare gappa basle asate. Aata udya adhyakshiya bhashan suru zalyavar mala cheer leaders hatat pom-pom gehun nachat aahet ashe drushya disun hasayala aale tar...tyala jababdar kon? Manjiri

Anonymous said...

Atre mastach. maazi adhichi comment kuthetari geli! Aata udya mala da bhinche bhashan suru zalyavar nachnarya cheer leaders disnar!

Rajesh said...

@ Snehal, I too wait for his writings these days.
अप्रतिम!
Abhijit. Thanks for an interesting blog.

Unknown said...

The best.

vishwas kothari said...

good one. a bit longish at the beginning. still, good one.

macrothescribe said...

atre farach sunder blog jamla ahe, mala tumchya blogni homesick kele ekdam, mi kharach punyatle karykram ani sarvaprakarche khane mhanje bedekarchya misali pasun ani appachya khichdi-kakdi pasun te marzurinchya chicken sandwitch ani the placechya sizzler paryant sagle kahi miss karto ahe

Anonymous said...

TEST MESSAGE