Wednesday, March 17, 2010

कविता:-- ते चार मृत्यू

ते चार मृत्यू 
===============
ठरवले होते मेल्यावर
एकदा बसायचे चित्रगुप्ताबरोबर
चाळायची त्याची चोपडी
सोडवायची ती कोडी
मृत्यूची.

ते चार मृत्यू
मनास सतत सलणारे
डोक्यात पिंगा घालणारे
तर्क वितर्क जाळणारे
प्रश्नचिन्हातच उरणारे
ते चार मृत्यू

ठरवले होते
विचारायचे त्याला

असा कसा तो धुमसला वारा
आभाळातून ढळला तारा
खरेच का ते विमान पडले
का आझाद साधू बनून दडले?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का झोकाळाला आसमंत सारा
विझला कसा जय जवान जय किसानचा नारा
खरेच हृदयाचा ठोका बंद झाला
का ताश्कंदमध्ये होता विषाचा पेला?

ठरवले होते
विचारायचे त्याला

का टाकली फुलराणीने उडी
का थांबली नाही ती आगीनगाडी
कशी तुडवलीस रूळावरती तू तरी
हरिततृणांची मखमल सारी?


ठरवले होते
विचारायचे त्याला

असे कसे धजावले गुरुजींचे मन
का घेतले त्यांनी मृत्यूचे महाचुंबन
किती साधना अन राष्ट्रभाषा
मग कोणती होती निराशा ?


ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता

अनेक सुभाषचंद्र कोसळलेत
मिग विमानांच्या शवपेटीत
काळाच्या खोल खोल गर्तेत

लालबहादूर शास्त्रींच्या मागे चाललेत
शेतकऱ्यांचे तांडे, भांबावलेले
मरूनसुद्धा पाशात लटकलेले

निशब्द झाली आहेत बडबडगीते
भारत इंग्लिशस्कूलच्या सहलीची (*)
फुरसुंगीच्या रुळांवर विखुरलीत
पाने बालकवींच्या कवितेची

आणि या साने गुरुजींच्या भूमीत
हे झाले आहे रोजचे
एक श्याम आईचे बोट सोडतोय, कायमचे

ठरवले होते
विचारायचे त्याला
पण नाही विचारणार आता
चित्रगुप्ता
मी तरी किती किती कहाण्या ऐकणार
आणि तू तरी काय काय लिहून ठेवणार
========
अभिजित अत्रे
============

(*):-- साधारण पंधरा वर्षापूर्वी फुरसुंगीच्या रेल्वेफटकातून जाताना शिवाजीनगरच्या भारत इंग्लिशस्कूलची सहलीवरून परतणारी एक बस रुळावर फसली. भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने ही बस उडवली. पाचावी सहावीच्या मुलांची सत्तावीस किवा जास्तच प्रेते मी त्या दिवशी पहिली. आठवले कि अजून अंगावर काटा येतो. पिवळे तांबूस उन कोवळे म्हणणरे, फुराणीला जोजवणारे बालकवीही वयाच्या २८व्या वर्षी असेच रेल्वेखाली पडून गेले. ती आत्महत्या होती कि अपघात हे मराठी कवितेला कधीही न सुटनारे कोडे.
===========

No comments: