Wednesday, July 18, 2012

का येत नाही पाउस?

ते म्हणाले भक्ती आटलीय म्हणून...
आम्ही विठोबाला साकडे घातले

ते म्हणाले माणसा माणसात तेढ वाढलीय म्हणून...
आम्ही सर्वधर्मीय प्रार्थना म्हटली

ते म्हणाले प्रथा पाळल्या नाहीत म्हणून...
आम्ही बेडूक बेडकीचे लग्न लावले

ते म्हणाले लिकेजचे तळतळाट लागले म्हणून...
आम्ही बंद नळाच्या बंद योजना पुन्हा सुरु केल्या

ते म्हणाले पाणी वळवले नाही म्हणून...
आम्ही ब्रम्हपुत्रा-मुठा नदीजोड प्रकल्पाचे टेन्डर काढले

ते म्हणले  भ्रष्ट्राचार वाढला म्हणून...
आम्हीं सगळ्या धरणातला गाळ उपसून काढला

ते म्हणाले हार्वेस्टिंग केले नाही म्हणून...
आम्ही करमाफी जाहीर केली

ते म्हणाले झाडे लावली नाहीत म्हणून...
आम्ही वृक्ष प्राधिकरणास हाय कोर्टात खेचले

ते म्हणाले ग्लोबल वार्मिंग झाले म्हणून...
आम्ही निसर्गप्रेमींना रिओच्या समिटला पाठवले

ते म्हणाले कार्बन क्रेडीटस मिळवले नाहीत म्हणून....
आम्ही राज्यसभेत शोध मोहीम चालू केली

ते म्हणाले अडलेले पाणी जिरले नाही म्हणून...
अम्ही पद्मश्री, पद्मविभूषण आणि बरच काही बहाल केले

बंडूला मात्र एक कळेना
एवढं सग्गळ सग्गळ करूनही
हिंदी आणि अरबी महासागरात अजूनही
कमी व विचित्र अशा दाबाचे पट्टे
वायदेबाजारात गोदामातील धान्यावर 
जास्त भावाचे अन जास्त दाबाचे सट्टे
अन त्याच्या डोस्क्यावर अजूनही
चिंतेचे 'काले घने बादल'
============
अभिजीत अत्रे

2 comments:

SUBHASH said...

Kya baat hai Abhijit !

- Subhash Naik.

Unknown said...

Nice poetry (comments) Abhijit...You make me feel proud about you... good work.. keep it up...

Hemant Wadhavankar