Monday, November 5, 2012

एका गुंठा मंत्र्याची कैफ़ियत

भिंतीला ओल आली की
बुरशी धरते, पोपडे पडतात
मोड येत नाहीत, मातीसारखे
तरीही परवानगी दिलीत
एन.ए. ला, गुंठेवारीला
धरणीशी जोडलेली नाळ
अशी एका फटक्यात तोडलीत?
विचारले एकदा पत्रकारांनी मंत्र्यांना, खाजगीत
तेव्हा ते हसले, म्हणाले, भलेबहाद्दर
आता तुम्ही जाब विचारणार आम्हाला?
आमच्या सगळ्याच पिढ्या बरबाद झाल्या की
शेतीच करता करता, तेव्हा कुठे होता तूम्ही?
आम्हीही लहानपणापासून एकत आलो
भारत एक कृषी प्रधान देश आहे
पण कृषी करणारा कधीच प्रधान झाला नाही
फक्त आज्या - पणज्याच्या हातावरच्या
कमनशिबी रेषाच उमटत राहिल्या अवजारांवर
आयुष्य सलत राहिले पायात रुतलेल्या
बांधावरच्या बाभळीच्या काट्या सारखे
कणसात कधी दाणे भरलेच नाहीत असे नाही
पण जास्त करून दारिद्र्यच पिकले
कॉंग्रेसच्या गवतासारखे, वर्षानु वर्षे
आणि पिढ्यानां सवय झाली
अंधाराने घर सारवायची
अशी सवय मोडणे खूप कठीण
तुमच्यापेक्षा जास्त आमचा बाप चिडला होता
दोन दिवस जेवला नाही, बोलला नाही
त्याला जबरदस्तीने उचलून
इथे या फ्ल्याट मध्ये थांबवले
आता त्यालाही कळतय
तळ बुडालेल्या विहिरीतून पाणी शेंदण्यापेक्षा
खूप सोपे असते फ्लशचे बटण दाबणे
निर्णय घेताना माझेही  डोळे  भरून  आले  होते
पण काळी आईच कंटाळली होती
म्हणाली, असे अर्धवट भिजून
कुणाचेच कल्याण होत नाही
एकदाच काय ते
सिमेंटने न्हाऊ माखू घाल
बळी राजाचे राज्य नाही आले या देशात
गुंठामंत्र्यांचे तरी येऊ दे!
================
अभिजित अत्रे

6 comments:

BinaryBandya™ said...

sundar

अनिकेत वैद्य said...

नेहमीप्रमाणेच उच्च

Pravin said...

रडवणारी कविता ! काळजाला हात घालणारी भीषण वास्तवता! ८० % शेतकरी शेतकरी एक पीक काढण्यासाठी १०००० खर्च करीत असतील तर त्यातून उत्पन्न मात्र ५००० ते १०००० या रेंज मध्ये निघते . फार कमी वेळेस ते ११००० ते २०००० या रेंज मध्ये असते .त्यांचा शेती माल ,धान्य खूप कमी भावाने (भाव पडून )घेवून दलाल ,व्यापारी ते दुप्पट /तिप्पट भावाने विकतात.

Tulip :A conversation with the self said...

stringent mock..every doer has his argument for his action..and Mr Minister has always too many.... brilliant sir!!!

Harsha said...

Aprateem !!

Unknown said...

काळजाला भिडणारी कविता